श्रद्धांजली
schedule04 Aug 26 person by visibility 142 categoryसामाजिक
⚫राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली
▪️उत्तर पूर्व राज्यातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण प्रवाहात आणले
मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्रिपुराचे माजी राज्यपाल शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. डॉ. डी. वाय. पाटील हे त्रिपुराचे राज्यपाल असताना त्यांच्याशी घनिष्ट परिचय झाला. त्रिपुरा तसेच बिहार येथे राज्यपाल पदावर कार्य करीत असताना आपले विनम्र आचरण व सौजन्यशील स्वभावामुळे त्यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा वाढवली. डॉ. डी. वाय. पाटील हे द्रष्टे शिक्षण तज्ज्ञ होते.
उत्तर – पूर्व राज्यातील अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण प्रवाहात आणले. डॉ. पाटील यांनी महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्था उभारल्या. गेल्या तीन दशकांमध्ये या संस्थांनी लाखो विद्यार्थी घडवले असून आज ते विविध क्षेत्रात योगदान देत आहेत. समाजकारण, राजकारण व शिक्षण क्षेत्रातील डॉ.पाटील यांचे कार्य भावी पिढ्यांना मार्गदर्शक राहील. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
-----------------------------------
◼️दूरदृष्टी असलेले शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना मंत्री प्रताप सरनाईक यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तीव्र दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आपल्या शोकसंदेशात मंत्री सरनाईक म्हणाले की, “डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. समाजहिताची जाणीव ठेवून उभारलेला त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.”
“डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टीचा शिक्षणमहर्षी, समाजाभिमुख विचारवंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” अशा शब्दांत मंत्री सरनाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
--------------‐--------------------
⚫ पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला शोक
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सहकार क्षेत्रातील एक दूरदर्शी नेतृत्व हरपल्याची भावना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.
मंत्री आबिटकर म्हणाले, "डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली. ग्रामीण भागापासून ते जागतिक स्तरापर्यंत दर्जेदार शिक्षण संस्था उभारून त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी, सहकार आणि सेवाभाव यांचा आदर्श त्यांनी आयुष्यभर जपला."
"त्यांच्या कार्याची दखल देश-विदेशात घेण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनाने समाजाचा मोठा आधारवड हरपला आहे," असेही आबिटकर यांनी नमूद केले.
दिवंगत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री श्री. आबिटकर यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली की, दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तेष्टांना आणि असंख्य विद्यार्थ्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो.
------------------------------
◼️गोरगरिबांची मुले डॉक्टर आणि इंजिनियर व्हावीत हे कै. डी वाय. पाटील यांचे स्वप्न.....! : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूरचे सुपुत्र, माजी राज्यपाल, शिक्षणमहर्षी डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे अतिव दुःख झाले. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. विशेषतः तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी व्यवसायिक शिक्षणाबद्दल धोरण आखल्यानंतर महाराष्ट्रामध्ये यासाठी फार मोठा पुढाकार डी. वाय. पाटील यांनी घेतला. गरीब समाजातील मुले डॉक्टर आणि इंजिनिअर व्हावीत, हे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवले. राज्यपाल म्हणून त्रिपुरा, बिहार या दोन राज्यांमध्ये त्यांनी काम केले. ते अतिशय धाडसी व जिद्दी स्वभावाचे होते. एखादी गोष्ट मनावर घेतली की जिद्दीने पूर्ण करणारे असे डी. वाय. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व होते. अशा एका थोर नेत्याला आणि समाजसेवकाला आपण मुकलेलो आहोत. अशा शब्दात मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
--------------------------------
◼️शिक्षणविश्वाचा आधारवड हरपला : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक दूरदृष्टीचे नेतृत्व हरपले आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विचारातून त्यांनी उभारलेले शैक्षणिक साम्राज्य लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ठरले. राज्यपाल, लोकप्रतिनिधी आणि शिक्षणमहर्षी म्हणून त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या कार्याचा लाभ देशभरातील असंख्य विद्यार्थी, शिक्षक आणि समाजाला झाला आहे. साधेपणा, दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी ही त्यांची खरी ओळख होती. त्यांचे विचार आणि कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान राहतील. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि दुःखाच्या या प्रसंगी पाटील परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, अशा शब्दात आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.